१ जून नंतरच कापसाची लागवड करावी, तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यामध्ये खरीप हंगामात होणार २,६६,३००/- कपाशी पाकीटांचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती कृषी अधिकार्यांनी दिली.
येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरीत कापासाच्या बीजी-१ वाणांसाठी प्रति पाकीट ६३५ तर बीजी-२ वाणासाठी ८५३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापसू बियाणचा संभाव्य ५३,००० हेक्टर क्षेत्रासाठी २,६६,००० पाकीटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्यो बीजी-२ वाणांसाठी २,६२,६०० पाकीटे तर नॉनबीटी वाणांसाठी ३७०० पाकीटांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. कपाशीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना टंचाई भासणार नाही.
स्वदेशी ५ बियाणे या वर्षी उपलब्ध नाही
१ जून नंतरच कापूस बियाण्याची लागवड करावी. तसेच स्वदेशी ५ बियाणे या वर्षी उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध झाल्यास ते खरेदी करू नये. निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तालुका कृषि अधिकारी अमळनेर किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांच्याकडे त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन कृषि अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांनी केले आहे.
खरीप हंगामात खताचा मुबलक पुरवठा
अमळनेर तालुक्यात ३१ मार्च २०२३ रोजी ६७०० मेट्रीक टन खत साठा शिल्लक असून खरीप हंगाम सन २०२३ साठी २३००० मे.टन खताचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना कुठल्याही प्रकारच्या खताची टंचाई खरीप हंगामात येणार नाही असे कृषि अधिकारी यांनी सांगितले.